शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी वेदान्त प्रकल्पावरून शिंदे-फडणवीस सरकारला चांगलंच घेरलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुजरात म्हणजे पाकिस्तान आहे का? या वक्तव्याचा आदित्य ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. महाराष्ट्र म्हणजे पाकिस्तान आहे का, ज्यामुळे प्रकल्प गुजरातला पळवून लावला. महाराष्ट्राच्या मुलांनी काय चूक केली? असा खरमरीत सवाल आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला विचारला. आदित्य ठाकरे यांनी आज थोर समाज सुधारक संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन केलं. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आदित्य ठाकरे म्हणाले, आज माझ्या पणजोबांची जयंती आहे आणि मी अभिवादन करायला आलो आहे. माहीममधल्या शिवसैनिकांना भेटलो. माझ्या पणजोबांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा दिला. आज ‘मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन’ही आहे. येथून गुजरातला प्रकल्प गेला, याचं कोणाला दुःख नाही, याची मला खंत वाटतेय, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
हेही वाचा- “…म्हणून मंत्र्यांनी अद्याप सूत्रं हाती घेतली नाहीत” नवीन सरकारमधील नाराजीनाट्याबाबत धनंजय मुंडेंचं मोठं विधान, म्हणाले…
आदित्य ठाकरे यांनी यावेळी सरकारने लावलेल्या चौकशीवर भाष्य केलं. महाराष्ट्रासाठी कोणी काही बोलायला लागलं की त्याच्यावर आरोप करायचे, त्याची बदनामी करायची, त्याची चौकशी मागायची म्हणजे महाराष्ट्राचा आवाज बुलंद करणं, हा आपल्या देशात गुन्हा झालाय का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. तसंच पुढे ते म्हणाले, चौकशी कोणाची करणार? केंद्राची करणार की अग्रवाल यांची करणार? असे प्रश्न उपस्थित करत आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारला कोंडीत पकडलं.
हेही वाचा- “तुम्हाला एकच मुलगी आहे, उद्या काही झालं तर अग्नी कोण देणार? त्या प्रश्नावर मी म्हणालो…”; शरद पवारांनी सांगितली आठवण
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, घटनाबाह्य सरकार आल्यानंतर दोन-चार घटना घडल्या. २६ जुलैला मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं होतं की वेदान्ता महाराष्ट्रात येणार आहे, ४ लाख कोटी घेऊन येणार आहेत. एमआयडीसीच्या मॅगझीनमध्ये सांगितलं की एक लाख कोटी घेऊन येणार आहेत. अजून एक गोष्ट समोर आली की, २९ ऑगस्टला उपमुख्यमंत्री आणि अनिल अगरवाल यांची भेट झाली. ही भेट लहान भावाला प्रकल्प देण्यासाठी झाली का? असा गंभीर सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.