आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या फाशीचा दिवस 3 फेब्रुवारी आद्य क्रांतिकारक हुतात्मा दिन जाहीर करावा या मागणीसाठी शासनाकडे आग्रह धरणार -आमदार अरुण (आण्णा) लाड
सांगली -भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांनी 1820 ते 1832 या कालखंडात इंग्रज सरकारविरुद्ध प्रथमच बंडाचा झेंडा उभारला आणि महाराष्ट्राच्या एका भागात स्वतःचे राज्य निर्माण केले. अशा या लढवय्या क्रांती वीरास इंग्रज सरकारने तीन फेब्रुवारी 1832 रोजी पुणे येथील खडक माळ या ठिकाणी फाशी दिले. आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक संपूर्ण भारतासह महाराष्ट्राची एक स्वतंत्र अस्मिता ठरली आहे.त्यामुळे महाराष्ट्र सरकारने 3 फेब्रुवारी हा दिवस आद्यक्रांतिकारक हुतात्मा दिन म्हणून जाहीर करावा या आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडच्या मागणीचा पाठपुरावा शासनस्तरावर करणार असल्याची ग्वाही पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण (आण्णा)लाड यांनी दिली.
काल आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड च्या पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ आमदार मा.अरुण (आण्णा)लाड यांना भेटले व या मागणीसंबंधी चर्चा करुन निवेदन दिले. तेव्हा आमदार मा.अरुण लाड म्हणाले की उमाजी नाईक यांचे कार्य हे इतिहासातील सर्वात प्रेरणादायी कार्य असून त्यांच्या कार्याची महती म्हणावी तेवढी पुढे आलेली नाही.स्वातंत्र्यलढ्याच्या पहिल्या पर्वात हुतात्मा झालेल्या आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांना फाशी दिलेला दिवस 3 फेब्रुवारी हा महाराष्ट्र शासनाने आद्यक्रांतिकारक हुतात्मा दिन म्हणून जाहीर करावा यासाठी मी मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयंत पाटील यांच्याकडे आग्रह धरणार असून या रास्त मागणीचा पाठपुरावा केला जाईल.यावेळी भेटलेल्या शिष्टमंडळात आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचे राज्य निमंत्रक मारुती शिरतोडे, राज्य उपाध्यक्ष दगडू जाधव, राज्य सरचिटणीस हिम्मतराव मलमे तसेच संघटक लक्ष्मण शिंदे बाळासाहेब खेडकर,सोशल मिडीया प्रमुख महेश मदने यांचेसह पलूस शहर शाखेचे पदाधिकारी अनिल जाधव, रमेश जाधव ,आशिष जाधव, सुनील जाधव, संजय जाधव ,धनाजी जाधव, अमित शिरतोडे ,हर्षवर्धन जाधव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.