शेत रस्त्याचे वाद असतील तर शिवार हेल्पलाइनला कॉल करा-जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेला शिवार फाऊंडेशनची समन्वयकाची भुमिका
उस्मानाबाद :- शेती, बांध व शेत रस्ता म्हटलं की गावागावात त्याचे वाद सुरू असतात. या रस्त्यावरून भावांमध्ये, भावकी मध्ये किंवा गावकऱ्यांमध्ये खूप वेळा तुंबळ हाणामारी पण होतात. हे वाद अनेक वर्षे चालत राहतात व यात शेतकरी सर्व बाजूने पिचत जातो. तो मानसिकरीत्या खचून जातो. कोर्टात खटले उभे राहतात, आर्थिक ताण, नैराश्यातून शेतकरयांनी आत्महत्या केलेल्या ही घटना मागील काही वर्षांत समोर आलेल्या आहेत.
गेल्या सहा महिन्यात शिवार हेल्पलाइनवर शेत रस्ता वादाचे सहा कॉल आलेले आहेत, त्यापैकी सर्वाधिक तीन कॉल हे कळंब तालुक्यातून असून उस्मानाबाद, तुळजापूर, लोहारा तालुक्यातील प्रत्येकी एक कॉल आहे. संबंधित जिल्हा यंत्रणेशी हे प्रश्न चर्चा करून सोडवण्याची कार्यवाही सुरू आहे.
जिल्ह्यातील शेत रस्त्याचा संघर्ष थांबवण्यासाठी लातूर पॅटर्नच्या धर्तीवर शेत रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी हाती घेतली आहे. या मोहिमेला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळावा व शेत रस्त्याच्या अडचणी असणाऱ्या शेतकऱ्यांनी स्वतःहून पुढे येऊन त्याचे प्रश्र्न मार्गी लागावेत यासाठी शिवार हेल्पलाईन ८९५५७७१११५ ला संपर्क साधावा .