फोटो- प्रतीकात्मक |
बार्शी तालुक्यात व इतर शेजारील तालुक्यातून येणारी रुग्णसंख्या पाहता उपलब्ध आरोग्य सुविधा अपुरी
बार्शी / प्रतिनिधी – राज्य शासनाने त्याचबरोबर जिल्हाधिकारी सोलापूर यांनी ब्रेक द चेन”च्या संदर्भाने 14 तारखेच्या रात्री आठ वाजल्यापासून आदेश निर्गमित केले आहेत. आदेश निर्गमित केल्यानंतर बार्शी शहरातील परिस्थिती पाहता ज्या आस्थापना , दुकाने चालू राहिलेले आहेत. तिथे आणि शहरात नागरिकांना कुठल्याही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येत नाही. लोक बिनधास्त फिरत आहेत असे दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर जे शासन आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये मुद्दा क्रं. 3 इ मध्ये स्पष्टपणाने ,”आवश्यकता असल्यास काही ठिकाणी स्थानिक प्रशासनाने बंद केल्याचे घोषित करावे”. असे नमूद आहे. याचा आधार घेऊन बार्शी शहर व तालुक्यातील स्थानिक प्रशासनाने वाढणारी कोरोना रुग्णांची आकडेवारी लक्षात घेता मार्च 2020 प्रमाणे कडक निर्बंधासह जनता कर्फू करावा , अशी मागणी बार्शी नगरपालिका विरोधी पक्ष नेते नागेश यांनी अक्कलकोटे जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांना पत्राद्वारे केली आहे.
पत्रात पुढे म्हटले आहे की सद्यस्थितीत बार्शी मध्ये एकूण 409 डेडिकेटेड कोव्हीड सेंटरमधील बेडची उपलब्धता आहे. यामध्ये जगदाळे मामा हॉस्पिटल 120 ,सुश्रुत हॉस्पिटल (डॉ.अंधारे ) संख्या 80 ,कॅन्सर हॉस्पिटल 40, सोमानी हॉस्पिटल 35, करगल हॉस्पिटल 35 ,चौधरी हॉस्पिटल 39 , पाटील हॉस्पिटल 15 , भगवंत डेडिकेटेड सेंटर 20 , शहा हॉस्पिटल 15 , ग्रामीण रुग्णालय 10 या सर्व 10 डेडिकेटेड कोविड सेंटरमध्ये ऑक्सीजन बेडची संख्या फक्त 205 आहे. तसेच व्हेंटिलेटर ची संख्या फक्त 13 आहे आणि एच एफ एन व ओ ची संख्या फक्त 13 आहे . त्याचबरोबर शासकीय सीसीसी अंतर्गत डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल या ठिकाणी 50 , श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे पॉलिटेक्निक कॉलेज या ठिकाणी 100, आयटीआय या ठिकाणी 90 ,तर प्रस्तावित छत्रपती भवन येथे 50 या प्रमाणे बेड ची सुविधा उपलब्ध आहे. त्याचबरोबर पांगरी येथे 50 बेड संख्यासह बार्शी तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रत्येकी 50 बेडची व्यवस्था करण्यात येत आहे. बार्शी शहरात आजूबाजूच्या माढा , मोहोळ , परंडा, भूम , वाशी , तुळजापूर , कळंब या सर्व तालुक्यातील येणारी रुग्ण संख्या लक्षात घेता ही उपलब्ध असणारी आरोग्य व्यवस्था अत्यंत अपुरी आहे हे वास्तव आहे.
एकूणच ही संपूर्ण परिस्थिती पाहता बार्शी शहर व तालुक्यातील चित्र अत्यंत विदारक ,भीतीदायक व गंभीर आहे. नेहमीप्रमाणे शहरात बिनधास्त फिरणारे लोक तसेच अनेक ठिकाणी होणारी गर्दी पाहता या संपूर्ण परिस्थितीवर कोव्हीड रुग्ण संख्या आटोक्यात येण्याऐवजी त्यामध्ये वाढ होण्याचाच धोका जास्तीचा संभवत आहे. कोरोना रुग्णावर होणारा खर्च , उपलब्ध न होणारी आरोग्य व्यवस्था, रेमडिसिव्हर इंजेक्शन साठी होणारी पळापळ , बेड उपलब्धतेसाठी होणारी पळापळ, लाखो रुपये खर्चूनही होणार्या मरणयातना किंवा मरण . यामुळे होणार आर्थिक मानसिक त्रास पाहता कडक लॉकडाऊन किंवा जनता कर्फ्यू ची अत्यंत ,नितांत गरज निर्माण झालेली आहे. तरी ब्रेक द चेन मधील मुद्दा क्रमांक 3 याचा आधार घेऊन स्थानिक प्रशासनाने बार्शी शहर व तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येचा वाढता आलेख रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन ची अंमलबजावणी अथवा जनता कर्फ्यू चा निर्णय घ्यावा,अशी मागणी बार्शी नगरपालिका विरोधी पक्ष नेते नागेश यांनी अक्कलकोटे जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांना पत्राद्वारे केली आहे.