उस्मानाबाद -गेल्या १ जून पासून उस्मानाबादमधील बळीराजासाठी शिवार हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाईनवर शेतकरी त्यांचे प्रश्न मनमोकळेपणाने मांडत आहेत. हेल्पलाईन सकाळी १० ते रात्री ६ या वेळेत मोफत उपलब्ध आहे.
सध्या जिल्ह्यात सुरू असलेला शेतात सोयाबीन न उगवण्याचा ज्वलंत प्रश्न याबाबत सर्वात जास्त फोन येत आहेत. तसेच गेल्या वर्षीचा विमा मिळाला नाही, विम्याचे पैसे चुकून दुसऱ्याच्या खात्यावर गेले आहेत, फळबागेचे अनुदान मिळाले नाही, निराधार चे पेन्शन मिळत नाही, शेतरस्त्याच्या अडचणीविषयी चे प्रश्न, नवीन फळबाग करण्यासाठी योजनेची माहिती असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्नांनी त्रस्त शेतकरी विचारत त्यामुळे आत्महत्येचे विचार, नैराश्य, इत्यादी भावना ही व्यक्त करत आहेत.
शिवार हेल्पलाईन च्या 8955771115 या हेल्पलाईन क्रमांकावर शेतकऱ्याचा फोन आल्यानंतर शेतकऱ्याला समुपदेशनाद्वारे प्राथमिक स्तरावर मानसिक बळ तज्ञ समुपदेशकाकडून दिले जाते. शासकीय, सामाजिक संस्था व वैयक्तिक अशा त्रिस्तरीय पातळ्यावरील उपायांच्या माध्यमातून शेतकऱ्याला समन्वय, सल्ला व मार्गदर्शन, संपर्क, मदत केली जात आहे. अशा पध्दतीने ही शिवार हेल्पलाईन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मार्गदर्शक ठरत आहे आणि त्याला शेतकरी उत्स्फूर्त प्रतिसादही देत आहेत.
यासाठी मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शनासाठी परिवर्तन ट्रस्ट, मारिवाला हेल्थ इनिशिएटिव्ह मुंबई, तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, महाजन महाविद्यालय उस्मानाबाद, कृषी महाविद्यालय गडपाटी उस्मानाबाद, बायर , जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस दल, कृषी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना या शासकीय, अशासकीय, स्वयंसेवी अशा सर्वच संस्थाचे सहकार्य मिळत आहे.अशी माहिती जिल्हा समनव्यक अशोक कदम यांनी दिली.