फारूक गवंडी यांना कराडे स्मृती प्रेरणा पुरस्कार जाहीर!


सांगली/सुहेल सय्यद

पंधरा हजार रोख व मानपत्र : रविवारी प्रा. प.रा.आर्डे यांचे हस्ते तासगांवात वितरण सोहळा

</p>

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जेष्ठ कार्यकर्ते राहिलेले स्मृतीशेष विजय काका कराडे यांचे व्दितीय स्मृती दिनानिमित्त अंनिस तासगांव व कराडे परिवाराच्या वतीने दिला जाणारा दुसरा ‘विजय काका कराडे स्मृती प्रेरणा पुरस्कार’ अंनिसचे कार्यकर्ते इंजि. फारूक गवंडी यांना जाहीर करण्यात येत आहे अशी माहिती सौ.वसुधा कराडे – शेटे यांनी दिली. विजय कराडे यांचे स्मृती जपण्यासाठी व पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळणेसाठी या पुरस्काराचा उपक्रम सुरू केला आहे. मागील वर्षी हा पुरस्कार अंनिसचे पूर्णवेळ कार्यकर्ते राहुल थोरात व भास्कर सदाकळे यांना दिला गेला होता.

या स्मृती पुरस्काराचे स्वरूप रू. पंधरा हजार रोख, मानपत्र व स्मृतीचिन्ह असे आहे, पुरस्काराचे वितरण अंनिस वार्तापत्राचे सल्लागार संपादक प्रा.प.रा.आर्डे यांचे हस्ते, जेष्ठ पुरोगामी विचारवंत डॉ. बाबुराव गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सुप्रसिद्ध वैद्यकीय सेवारती डॉ.विजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. हा पुरस्कार वितरण कार्यक्रम तासगांव येथे रविवार दि.१० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वा. होईल.

पुरस्कार्थी फारूक गवंडी हे १९९२ पासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते असून ते महावितरण मध्ये सहाय्यक अभियंता म्हणून नोकरी करतात.त्यांनी स्वकष्टाने अत्यंत गरीब परिस्थितीत उच्च शिक्षण घेतले आहे. त्यांनी कॉलेज जीवनापासूनच विजय कराडे यांचे मार्गदर्शनाखाली अंनिसच्या कामाची सुरुवात तासगांवातून केली होती.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामासोबतच फारूक गवंडी यांनी मुस्लिम सामाजिक प्रश्नांबाबत मुस्लीम अधिकार आंदोलनाच्या माध्यमातून प्रबोधन आणि संघर्ष केला आहे, नागनाथअण्णा नायकवडी यांच्यासोबत पाणी चळवळीचे काम तसेच कॉ.गोविंद पानसरे यांच्या सोबत समाजातील शोषित घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. तसेच CAA आणि NRC कायद्याच्या विरोधातील आंदोलनात त्यांनी व्याख्यानातून केलेले प्रबोधन,काढलेले मोर्चे या गवंडी यांच्या कामाची नोंद समाजाने ठळकपणे घेतली आहे.

मुस्लिमांच्या बद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी “मुस्लिमांच्या बद्दलचे भ्रम आणि वास्तव” या दोन भागातील व्हिडिओ संवादाची फारूक गवंडी यांनी निर्मिती केली आहे. ही निर्मिती परिवर्तनाच्या चळवळीत एक मैलाचा दगड ठरेल इतकी महत्त्वाची आहे.

या कार्यक्रमास कोरोना बाबत संपूर्ण खबरदारी घेऊन उपस्थित रहावे असे आवाहन अंनिस तासगांव व कराडे परिवार यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे संयोजन राहुल थोरात,अतुल वाघ,बाबुराव जाधव, प्रा.वासुदेव गुरव, अमर खोत, अमित कराडे, पांडुरंग जाधव, अशोक पाटील करीत आहेत.

Leave a Reply