Headlines

परिवर्तनवादी चळवळीचा झंझावात थांबला ,प्राचार्य डॉ. विठ्ठल शहाजीराव मोरे यांचे निधन

लातूर – प्राचार्य डॉ. विठ्ठल शहाजीराव मोरे महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत, परिवर्तनवादी चळवळीत विद्यार्थिदशेपासून कार्य करणारे विद्यार्थी ,शिक्षक, प्राध्यापक, शेतकरी, शेतमजूर, कामगार, अंगणवाडी कार्यकर्ते अशा विविध शोषित घटकांच्या न्यायहक्कासाठी संपूर्ण आयुष्य झगडणारे प्राचार्य डॉ विठ्ठल मोरे यांचे दि.१८/९/२०२०रोजी पहाटे ३.०० वाजता दुःखद निधन झाले.मोरे सर म्हणून ते महाराष्ट्रात सर्व परिचित होते.स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया, डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी युवक संघटनांचे ते महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष होते.प्राध्यापकांच्या मुक्टा व एमफुक्टो या संघटनांचे पदाधिकारी राहिले असून विद्यापीठाच्या सिनेट, व्यवस्थापन परिषद व विद्वत परिषदेचे सदस्य, राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे चेअरमन, तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष राहिले आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य सचिव मंडळाचेही ते सभासद राहिले आहेत. छात्र संघर्ष, युवा संघर्ष व क्रांतीज्योत या नियतकालिकांचे संपादक राहिले असून सध्या विचार मंथन या राज्यशास्त्र विषयातील संशोधन पत्रिकेचे प्रमुख संपादक होते. तसेच माकपचे मुखपत्र जीवन मार्ग या साप्ताहिकाच्या ते संपादक मंडळावर होते. कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी जि. उस्मानाबाद येथे तीस वर्षे राज्यशास्त्राचे विद्यार्थीप्रिय, प्राध्यापक प्रिय, प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.शिवाजी महाविद्यालय रेणापूर जिल्हा-लातूर, व शहीद भगतसिंग महाविद्यालय किल्लारी. जि. लातूर येथे प्राचार्य म्हणूनही त्यांनी काम केले. महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेचे अध्यक्ष राहिले आहेत. राज्यशास्त्र या विषयातील मौलिक योगदानाबद्दल त्यांना प्रा. दत्ता चौघुले स्मृती पुरस्कार ,स्वामी विवेकानंद पुरस्कार व विशेष सेवा योगदान व उपक्रमशील त्याबद्दल स्वामी विवेकानंद भूषण पुरस्कार मिळाले आहेत . त्यांच्या निधनाने पुरोगामी चळवळीचे फार मोठी हानी झालेली आहे.गोरगरीब विद्यार्थ्यांच्या अडचणीला आयुष्यभर धावून जाणारे आणि कामगार, शेतकरी व शेतमजुरांच्या न्यायहक्कासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे नेतृत्व काळाने हिरावले आहे. त्यांच्या या दुःखद निधन याबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली.

Leave a Reply