उस्मानाबाद :- यावर्षी बोगस बियाणे, अवकाळी पाऊस, करोनाचे संकट, पिक विमा अशा विविध संकटांना सामोरे जावून अखेर हाताला लागलेल्या पिकाला तरी योग्य भाव व विक्री संदर्भात योग्य साथ मिळावी म्हणून जिल्ह्यातील शेतकरी आ वासून वाट पाहत आहे, त्यामुळे बरेच शेतकरी त्रस्त ही आहेत.
चालू हंगामात सोयाबीन, मूग व उडीद यांची आवक बाजारात सुरू झाली, पण बाजार भाव हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून जिल्ह्यांमध्ये केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेड खरेदी केंद्र तालुकानिहाय सुरू करण्यात आले आहेत. खरेदी ही ऑनलाइन नाव नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचीच होणार आहे. किमान आधारभूत दर पुढील प्रमाणे आहेत.सोयाबीन ३८८० प्रति क्विंटल,मूग ७१९६ प्रति क्विंटल,उडीद ६००० प्रति क्विंटल. ज्या शेतकऱ्यांना आपले सोयाबीन, मूग, उडीद विक्री करायचा आहे त्यांनी खालील कागदपत्रांसह आपल्या तालुक्यातील खरेदी केंद्रावर नोंदणी करावी. ७/१२ व ८ अ उतारा, तलाठी यांच्या सही शिक्क्याने पिक पेरा दाखला,आधार कार्ड झेरॉक्स, राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, तसेच यावेळी शेतकऱ्यांनी चालू मोबाईल नंबर नोंदवणे गरजेचे आहे.
या सर्व प्रक्रियेमध्ये, कोणत्याही प्रकारचे सल्ला, मार्गदर्शन,केंद्राची तालुक्यानिहाय माहिती इत्यादी कोणतीही अडचण शेतकऱ्यांना आल्यास तात्काळ शिवार हेल्पलाइनला ८९५५७७१११५ संपर्क साधावा, कोणत्याही परिस्थितीत हतबल होऊ नये, असे आवाहन शिवार फाऊंडेशनचे प्रमुख विनायक हेगाणा यांच्याकडून करण्यात आले आहे. हेल्पलाइन सकाळी १० ते रात्री ६ पर्यंत मोफत आहे.