बार्शी/प्रतिनिधी – लग्नातील वराती आणि निवडणुका हे तरुण मुलांना आयुष्यात प्रथम दारू पाजण्याची प्रशिक्षण केंद्र झाल्याने आपल्या गावातील ग्रामपंचायत निवडणुका दारूमुक्त होतील यासाठी गावातील जाणत्या माणसांनी,महिलांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन दारूबंदी आंदोलनाने केले आहे.
निवडणुका आठवड्यात संपून जातील पण व्यसन हे आयुष्यभर टिकून राहील, हे व्यसनी तरुण तुमच्या माझ्या घरातीलच असणार आहेत,आज फुकट दारू पिणार्याना उद्या स्वखर्चाने दारू प्यावी लागणार आहे याचे भान ठेवून त्यामुळे दोन्हीही पॅनलने व गावातील जाणत्या लोकांनी गांभीर्य ठेवून दारू वाटणाऱ्या, मुलांना हॉटेलमध्ये नेणाऱ्या उमेदवारांना समज द्यावी व गावातील मतदारांनी असे उमेदवार पराभूत करावेत असेही आवाहन केले आहे. अशा उमेदवारांच्या तक्रारी निवडणूक निर्णय अधिकाऱयांकडे कराव्यात.
राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांनीही दारू वाहतूक,वेळ संपल्यावर रात्री हॉटेल उघडी राहणे व अवैध दारूची विक्री याबाबत लक्ष ठेवावे व कारवाई करावी याबाबत आंदोलनाच्या वतीने पत्र दिले जाणार आहे
तेव्हा दारूमुक्त निवडणूक व्हावी यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन आंदोलनाचे कार्यकर्ते अशोक सब्बन,हेरंबकुलकर्णी, रंजना गवांदे,भाऊसाहेब येवले, संतोष मुतडक,अमोल घोलप,कारभारी गरड,बाळासाहेब मालुजकर, संदीप दराडे,मारुती शेळके, जालिंदर बोडके, मनिष देशपांडे यांनी केले आहे.