Headlines

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ‘क्वारंटाईन’चे प्रमाण वाढवा -पालकमंत्री भरणे यांच्या सूचना


बार्शी, दि.२४: बार्शी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. प्रशासनाने कोरोनाचा प्रसार व संसर्ग रोखण्यासाठी क्वारंटाईन करण्याचे प्रमाण आणखी वाढविण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.
बार्शी येथे कोरोना उपाययोजना आढाव्याबाबत आयोजित बैठकीत श्री. भरणे बोलत होते. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार दिलीप सोपल, नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, तहसीलदार प्रदीप शेलार, पोलीस उपअधीक्षक एस.डी. भोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष जोगदंड, ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शितल बोपलकर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी शिवाजी गवळी, पोलीस निरीक्षक संतोष गिरी आदींसह अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
 श्री. भरणे म्हणाले, तालुक्यात 33 कोरोनाबाधित रूग्ण असून दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 370 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले. त्यापैकी 343 अहवाल आले असून बाकी प्रलंबित आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. संसर्ग कमी करण्यासाठी मुंबई-पुणे याठिकाणाहून आलेल्यांना होम क्वारंटाईनऐवजी संस्थात्मक क्वारंटाईन करण्याची गरज आहे. तालुक्यात चार हजार इतर किरकोळ आजारांचे रूग्ण आहेत, त्यांच्यावर प्रशासनाने लक्ष ठेवावे. त्यांना काळजी घेण्याविषयी समजावून द्यावे. प्रत्येक काम मिशन मोडवर पूर्ण करावे.
यावेळी लोकप्रतिनिधी, शेतकरी यांनी सोयाबीन उगवणीबाबत तक्रारी मांडल्या. याबाबत श्री. भरणे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या पिकांचे त्वरित पंचनामे करून त्यांना कृषी सहायकामार्फतही तक्रारी करता येतील. कृषी सेवा केंद्रात दरपत्रक दर्शनी भागात नसेल तर कारवाई करा. रेशनकार्ड नसणाऱ्या नागरिकांनाही रेशन देण्याची व्यवस्था त्वरित करा. वाळू चोरीच्या घटनांबाबत प्रशासनाने तपासणी करून कारवाई करावी.
 कोरोनाच्या काळात मदत करणाऱ्या सामाजिक संस्थांचे श्री . भरणे यांनी  आभार मानले. नागरिकांनी कोरोना महामारीत प्रशासनाला सहकार्य करावे. मास्कचा वापर, साबणाने हात धुणे, सामाजिक अंतर ठेवण्याबाबत जनजागृती करण्याच्या सूचना केल्या. आरोग्य कर्मचारी कंत्राटी पद्धतीने घेण्यास त्यांनी मान्यता दिली.
 नगराध्यक्ष तांबोळी यांनी डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफची मागणी केली. खासदार निंबाळकर यांनी  तत्काळ उपचार व्हावे, याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या. सदोष सोयाबीन बियाण्यावर बंदी घालण्याची मागणीही त्यांनी केली. श्री. सोपल यांनी बियाणांच्या मागणीनुसार पुरवठा झाला नाही, उगवण झाली नसल्याने त्याची नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *