बार्शी – बार्शी नगरपालिका बार्शी यांच्यावतीने आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव 2020 बार्शी नगरपालिका बार्शी या फेसबुक पेज वर ऑनलाईन व्याख्यान घेण्यात आले. हे व्याख्यान दिनांक 11 ऑक्टोबर 2020 रोजी झाले. अण्णा भाऊंच्या साहित्यातील व जीवनातील संघर्ष या विषयावर प्राचार्य डॉक्टर महेंद्र कदम यांचे व्याख्यान झाले. व्याख्यानाचे पहिले पुष्प गुंफले गेले. डॉक्टर कदम हे विठ्ठलराव शिंदे महाविद्यालय टेंभुर्णी येथे प्राचार्य म्हणून काम करतात ते साहित्यिक संशोधक आहेत.
या व्याख्यानात प्राचार्य डॉक्टर महेंद्र कदम म्हणाले,, वाटेगाव ते चिरागनगर येथपर्यंत अण्णाभाऊंचा असणारा संघर्ष हा वर्गीय व सामाजिक होता. अण्णाभाऊंचे योगदान हे साहित्यिक विचारवंत व कॉम्रेड म्हणून उंच प्रतीचे आहे. मार्क्स व मॅक्झिम गॉर्की यांच्या विचारांकडे अण्णाभाऊ आकर्षित होऊन कृतिशील लेखक विचारवंत बनले. अण्णा भाऊंचा संपूर्ण जीवनप्रवास हा मुक्त, स्वच्छ सम्यक, निधर्मी, डिकास्ट साम्यवादी जीवन पद्धती मार्क्सवादी विचाराकडे झुकलेली आहे त्यामुळे अण्णाभाऊ समतेचा संघर्ष करतात असेही ते म्हणाले. अण्णा भाऊंच्या साहित्यात अण्णाभाऊ ज्या माणसात जगले ती प्रत्यक्ष जीवनात संघर्ष करणारी उपेक्षित वर्गातील रांगडी माणसे अण्णाभाऊंनी साहित्यात रेखाटली आहेत. लाल बावटा कला पथकाची स्थापना करणारे अण्णाभाऊ हे न हारणारा संघर्ष जीवनात करतात व साहित्यात मांडतात व मार्क्सवाद-आंबेडकरवाद संयुक्त पणे पुढे घेऊन जातात तसेच शोषितांच्या बाजूने उभा राहून शोषणाला नकार देतात. अण्णाभाऊंनी गावपातळीवर असणारा संघर्ष जातीअंताचा संघर्ष व वर्गीय लढा त्यांच्या जीवनात अनुभवला तोच जीवनानुभव त्यांच्या साहित्यातून प्रकट होताना दिसतो. आजच्या परिस्थितीमध्ये असणारे शोषितांचे प्रश्न अण्णा भाऊंनी मांडलेल्या साहित्याच्या माध्यमातून सामाजिक वर्गीय संघर्ष पुढे घेऊन जाण्याची प्रेरणा देतात. हीच प्रेरणा घेऊन आज शोषितांनी शोषणकारी व्यवस्थेचे विरोधामध्ये उभा संघर्ष करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी मत प्रकट केले.
या ऑनलाईन व्याख्यानाच्या व्याख्यात्यांची ओळख श्रीधर कांबळे सर यांनी करून दिली. तर आभार कॉम्रेड प्रवीण मस्तुद यांनी मानले. या व्याख्यानाची तांत्रिक जबाबदारी पवन आहिरे यांनी पाहिली.