पंढरपूर/नामदेव लकडे -पंढरपूर शहरानजीक दगडी पुलाशेजारी असलेल्या बंधाऱ्याच्या वरील बाजूकडील भराव वाहून गेल्यामुळे या बंधाऱ्यास मोठा धोका उत्पन्न झाला होता.सदर भराव वाहून गेल्यानंतर भीमा पाटबंधारे विभागाकडून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेणे गरजेचे होते मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता जर उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले तर या ठिकाणी आणखी मोठे नुकसान संभावित होते.हि बाब लक्षात घेत बांधकाम विभागाचे सभापती विक्रम शिरसट यांनी या भरावाचे काम नगर पालिकेच्या माध्यमातून केले जावे असा आग्रह धरला.मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर याची दखल घेत सदर भराव दुरुस्तीच्या सूचना दिल्याने अखेर या दुरुस्तीच्या कामास सुरुवात झाली आहे.या बाबत सभापती विक्रम शिरसट यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर बंधाऱ्याच्या वरील भागातील भराव भीमा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग आल्याने वाहून गेला होता.हि बाब अतिशय धोकादायक होती तसेच नदीचा प्रवाह या ठिकाणी विभागला गेला होता त्यामुळे पुढे दगडी पुलाच्या बाजूस आणखी चारी रुंदावत जाणार होती.नगर पालिकेचे पाणी पुरवठा अभियंता आत्माराम जाधव यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली होती.वास्तविक पाहता सदर भरावाचे काम भीमा पाटबंधारे विभागाकडून तातडीने केले जाणे अपेक्षित होते मात्र त्यांच्याकडून दखल घेतली गेली नाही.पुढील संभाव्य धोका लक्षात घेऊन नगर पालिकेने हे काम हाती घेतल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.